महाराष्ट्राच्या अब्रूची लक्तरं निघाली, सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही- प्रकाश जावडेकर
नवी दिल्ली : महाराष्ट्रात महाविकास आघाडी नसून महावसुली आघाडी असल्याची टीका केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली.निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्या पत्रावरून राज्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. त्यात प्रकाश जावडेकर यांनी उडी घेत राज्य सरकारवर निशाणा साधला. “गेल्या ३० दिवसांमध्ये राज्यात उलथापालथी होत आहेत. रोज नवे खुलासे होत आहेत की त्यांचा ट्रॅक ठेवणं कठीण जात आहे. एक तर स्पष्ट झालं की ही महाविकास आघाडी नसून महावसूली आघाडी आहे. यांचा किमान समान कार्यक्रम म्हणजे पोलिसांकरवी पैसा गोळा करा, लुटा हाच यांचा एकमेव कार्यक्रम सुरू आहे. इतकं महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम महावसुली आघाडी सरकारनं केलं आहे. सचिन वाझे प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या अब्रूची लक्तरं निघाली आहेत. सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार उरलेला नाही, असा हल्लाबोल प्रकाश जावडेकर यांनी आज केला. ते नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते.
“दोन वर्षांपूर्वी वाझेला सेवेत घेतलं. फडणवीस म्हणाले ठाकरेंचा आग्रह होता म्हणून परमबीर सिंग यांनी त्यांना पुन्हा सेवेत घेतलं. जगात सगळं पाहिलं असेल, पण पोलिसच बॉम्ब ठेवतात हे कुणी पाहिलं नसेल. हेही मुंबईने पाहिलं.पोलिसच ज्याची गाडी चोरी झाली ती घेऊन जातात आणि त्यातच बॉम्ब ठेवतात. त्यानंतर ज्याची गाडी असते त्याची हत्या होते. हत्या कोणत्या हेतूने झाली हे तर आता समोर येईलच. नंतर मध्येच परमबीर सिंग यांचं पत्र येतं. एका न्यायाधीशांची समिती स्थापन होते.रश्मी शुक्लांचा अहवाल येतो. मग सीबीआयची चौकशी सुरू होते. अनिल देशमुखांचा राजीनामा येतो. एनआयएचा तपास सुरूच आहे. वाझेच्या गाड्या आणि पराक्रमातून रोज नवनवे खुलासे होतात. आणि आता वाझेचं पत्र आलंय”, असं प्रकाश जावडेकर म्हणाले.
“वाझेचं पत्र येताच उद्धव ठाकरे शांत झाले…”
सचिन वाझे यांच्या प्रकरणावरून प्रकाश जावडेकरांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. “राज्याचे मुख्यमंत्री ११ मार्चला सांगतात की सचिन वाझे ओसामा बिन लादेन नाहीत. त्याला प्रमाणपत्र देतात. वाझेला अटक झाल्यानंतर १४ मार्चला संजय राऊत म्हणतात एका सक्षम तपास अधिकाऱ्याला त्रास दिला जातोय. शेवटपर्यंत सचिन वाझेचं समर्थन करत होते.सचिन वाझे सत्य बोलेल की काय, यासाठी त्याचं समर्थन सुरू होतं. आता सचिन वाझेचं पत्र आलंय. पत्रात तर गंभीर आरोप केले आहेत. गृहमंत्र्यांनी वाझेंना पैसे वसूल करायला सांगितलं, पुन्हा सेवेत आल्यानंतर वाझेंना काढलं जाऊ नये यासाठी २ कोटी मागितले.
अनिल परब यांनी देखील भेडी बाजार पुनर्वसन योजनेतून ५० कोटींच्या वसुली करण्याची मागणी केली. पालिकेच्या कंत्राटदारांकडून देखील २ कोटींच मागणी केली. ही संपूर्ण लूट सुरू होती. पण जसे अनिल परब यांच्यावर आरोप झाले,तशी संजय राऊत यांची प्रतिक्रिया बदलली, उद्धव ठाकरे शांत झाले. आता वाझे सत्य बोलू लागल्यानंतर त्याच्याविरोधात बोललं जात आहे”, असा आरोप प्रकाश जावडेकर यांनी केला आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 8, 2021, 8:18 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY