आता समाज बोलणार नाही, तर आता आमदार, खासदार आणि मंत्री बोलतील, मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंची भूमिका आक्रमक
कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) प्रकरणी आता खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. आता समाज बोलणार नाही, तर आता आमदार, खासदार आणि मंत्री बोलतील, असं म्हणत त्यांनी आंदोलनाची दिशा जाहीर केली आहे. येत्या १६ जूनला कोल्हापुरातून पहिला मराठा मोर्चा काढण्यात येणार आहे. हे आंदोलन मूक असेल.
‘आम्ही बोललो, आता तुम्ही बोला’, असे या आंदोलनाचे घोषवाक्य असणार आहे. आंदोलनाच्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यातील आमदार, खासदारांना बोलावून भूमिका मांडण्याची विनंती केली जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. या मूक आंदोलनाची सरकारने दखल घेतली नाही तर त्यानंतर मुंबईत विराट ‘लाँग मार्च’ काढला जाईल आणि मुंबईतला मोर्चा सरकारला परवडणारा नसेल असा इशाराही संभाजीराजेंनी दिला आहे. कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका जाहीर केली.
याशिवाय मी मुंबईत मांडलेल्या मुद्यावर विचारही झाला नाही, कोणी किंमत दिली नाही, मात्र आम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत. ३६ जिल्ह्यांत आंदोलन करूनही सरकारने दखल घेतली नाही तर काय करायचं, आपण बांगड्या भरल्या आहेत का? दखल घेतली नाही तर एकदाच जोर लावायचा. पुण्यापासून मंत्रालयापर्यंत लॉंग मार्च काढायचा. पण ही वेळ आमच्यावर येऊ देऊ नका, असा इशारा संभाजीराजेंनी दिला.
संभाजीराजेंनी राजकारण्यांवरही घणाघाती टीका केली आहे. आपली व्होट बँक खराब होईल म्हणून राजकारणी मराठा समाजाच्या बाजूने भूमिका घेत नाही. पण मला ती काळजी नाही. आता आपण आक्रमक होणार, आता आपण आक्रमक होणार आहे. मी समाजाची दिशाभूल करणार नाही. आता आपण टेक्निकली डोकं लावून भूमिका घ्यायची आहे. आता पहिली जबाबदारी माझी, त्यानंतर खासदार आणि त्यानंतर आमदारांची आहे. तुम्ही समाजासाठी काय करताय हे आमदार-खासदारांना कोणी विचारलं का? ही दिशा फक्त कोल्हापूरसाठी नाही तर राज्यासाठी असेल. १० वर्षांनंतर कोणी बोट ठेवल अशी भूमिका मी घेणार नाही. आरक्षण नाकारल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कोण चुकलं यावरच जास्त चर्चा सुरू झाली. चुका काढण्यापेक्षा या राजकीय नेत्यांनी मार्ग सांगितले पाहिजेत. राजकीय खेळ सुरू झाल्यानेच मी आक्रमक भूमिका घेतली, असं संभाजीराजेंनी सांगितलं.
मी मुंबईत मांडलेल्या मुद्यावर विचारही झाला नाही, कोणी किंमत दिली नाही. अजित पवार यांनी फक्त फोन केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राहुल शेवाळे यांच्याकडून बोलण्याचा प्रयत्न केला. शाहूंच्या भूमीतून आंदोलनं व्हावी अशी माझी भूमिका आहे. १६ तारखेला आपण समाजासमोर कसं जाणार आहोत, मला समजून घ्या, मी जी भूमिका घेईन ती समाजाच्या हिताची असेल. माझं उद्धव ठाकरे यांच्याशी चांगलं जमतं तसंच फडणवीस आणि अजित पवार यांच्याशीही जमतं, असं संभाजीराजेंनी नमूद केलं.
कोल्हापूरनंतर नाशिक, अमरावती, संभाजीनगर आणि रायगड या चार ठिकाणी आंदोलन होणार असून कोल्हापूरमधल्या आंदोलनाप्रमाणेच राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये आंदोलन होणार आहे. १२ तारखेला कोपर्डीला जाणार, तसंच जलसमाधी घेतल्या काकासाहेब शिंदे स्मारकालाही जाणार. आम्ही आमचा आक्रमकपणा सोडणार नाही. आमच्याशी खेळ करू नका, असा निर्वाणीचा इशारा संभाजीराजेंनी दिला.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: June 10, 2021, 7:38 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY